अमरावती, दि. २८ : अनाथ, निराश्रीत, बेघर किंवा अजुन काही कारणाने संकटात असलेल्या मुलांना संस्थांमधे ठेवण्याऐवजी कुटुंबात ठेवावे यासाठी महिला व बालविकास विभागाकडून बाल संगोपन योजना राबविण्यात येते.
त्याच्या अनुदानात वाढ करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, सध्या अशी 17,000 (सतरा हजार) बालके, मुले कुटुंबात आहेत. यावर स्वयंसेवी संस्था, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी लक्ष ठेवतात. संगोपन करणार्या पालकांना प्रती बालक दरमहा 425 रु अनुदान देण्यात येते ते वाढवून 1,100 करण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
याची अमंलबजावणी करणार्या ज्या संस्था आहेत त्यांना प्रती बालक 75 वरुन 125 रु अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी आता 14 कोटी 57 लाख 40 हजार अतिरिक्त निधी लागणार आहे. याआधी 9 कोटी खर्च होता तो आता 24 कोटी 45 लाख झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.