देशात मी म्हणजे सर्वस्व आणि मालक हे दिल्लीतही कधी चालेले नाही, तर गल्लीत काय चालणार आहे. बाळासाहेब देसाई यांना लोकनेते का म्हणतात? याचा बालक, पालक आणि मालकांनी अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही आजही मुंबईत अनेक प्रसंगी बाळासाहेब देसाई यांचं उदाहरण देतो की नेता कसा असावा. म्हणून ते लोकनेते आहेत, असे मत खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री शंभूराज देसाई यांना टोला लगावला आहे.
- संजय राऊत सातारा आणि पाटण दौऱ्यावर आहेत, पाटण येथे संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“येथे कोणीही मालक होऊ शकत नाही, कारण देशात लोकशाही आहे. ही लोकशाही दिल्लीत आणि पाटणलाही आहे. त्यामुळे अनेकदा आपण पराभूत झाला, जिंकलात आता परत पराभूत होणार आहे,” असा इशाराही संजय राऊतांनी शंभूराज देसाईंना दिला आहे. येथे राजेशाही नाही. राजांना सरकार म्हणण्याची पद्धत असू शकते, पण राजांनाही लोकांतून निवडून येऊनच राज्य करावे लागते. मी म्हणजे सरकार आणि राज्य हा अहंकार वाढायला लागतो. तेव्हा लोक घरी पाठवतात. पाटणमध्ये ही वेळ आली आहे, असेही संजय राऊतांनी म्हटलं आहे.