नवी दिल्ली | कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. त्यात सध्या बेड आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आक्सिजनभावी लोकांना आपला प्राणा गमवाव लागला आहे. अशात देशातील नामांकित संस्थांमधील 100 शास्त्रज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून, आतातरी काहीतरी करा, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं आहे.
सरकारी स्तरावर अनेक गोष्टींना मान्यता मिळण्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळे अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात काहीतरी उपाययोजना करून संशोधनासंदर्भातील मान्यता देणारी प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी या शास्त्रज्ञांनी मोदींकडे केली आहे.
आयसीएमआरकडील माहिती ही सरकारमध्ये नसणाऱ्यांसाठी तसेच कदाचित सरकारमधील अनेकांना मिळत नसावी. विज्ञान आणि माहितीतंत्रज्ञान विभागाकडून मान्यता प्राप्त तसेच निती आयोगाने स्थापन केलेल्या नव्या समितीमधील बहुतांश वैज्ञानिकांना ही माहिती पुरवली जात नाही, असं पत्रात म्हटलं आहे.
सरकारी पातळीवर होणाऱ्या दिरंगाईमुळे वैज्ञानिकांना चाचण्यासंदर्भातील नवीन पद्धतींवर संशोधन करण्यास आणि त्या अंमलात आणण्यात अडचणी येत आहेत. या अशा अटी आणि दिरंगाईमुळे विषाणूंचा अभ्यास करून त्याचा फैलाव कमी प्रमाणत होण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातील संशोधन रखडून पडले आहे. सरकारी अनास्थेचा फटका आम्हाला बसत आहे, अशा शब्दांत शास्त्रज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे.