वाशीम । जिल्ह्यात साेमवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे जिल्ह्यातील २७ रस्ते बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये वाशीम तालुक्यातील राजगाव येथील नाल्याला पूर आल्याने राजगाव ते अनसिंग रस्ता, अटकळी येथील नाल्याला पूर आल्याने अटकळी ते येवती रस्ता बंद आहे. तोंडगाव येथील चंद्रभागा नदीला पूर आल्याने वाहतूक बंद आहे. चंद्रभागा नदीला पूर आल्याने वाशीम ते बोरखेडी रस्ता, अडाण नदीला पूर आल्याने पार्डी टकमोर ते जनुना, सोनवड, पार्डी टकमोर ते वारा जहागीर रस्ता बंद आहे. बिटोडाजवळील शेत शिवारात नाल्याला पूर आल्याने पार्डी टकमोर रस्ता, पूस नदीला पूर आल्याने वाराजहाँगीर ते अनसिंग रस्ता बंद आहे, काजळंबा शिवारातील नाल्याला पूर आल्याने येथील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तात्पुरता संपर्क तुटला आहे. खरोडा गावाजवळील नाल्याला पूर आल्याने कमी उंचीच्या पुलामुळे तात्पुरता संपर्क तुटला आहे. रिसोड तालुक्यातील खडकी (खंगारे) शिवारात अढळ नदीला पूर आल्याने मालेगाव तालुक्यातील रिठद ते शिरसाळा, शिरसाळा ते खडकी ढंगारे या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा तात्पुरता संपर्क तुटला आहे. रिठद गावाजवळील अढळ नदीला पूर आल्याने रिठद बसस्थानकावरून गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. मालेगाव तालुक्यातील अमनवाडी, मुसळवाडी, कुत्तरडोह, माळेगाव व धरमवाडी या गावाचा संपर्क काटेपूर्णा नदीला आलेल्या पुलामुळे तुटला आहे. पांगरी (नवघरे) गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील पिंपरीजवळून वाहणाऱ्या अडाण नदीला आलेल्या पुरामुळे पिंप्री ते खरबी रस्ता, आसेगाव जवळील भोपळपेंड नदीला आलेल्या पुरामुळे आसेगाव ते मंगरूळपीर रस्ता, मोझरीजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे मोझरी ते पिंप्री (बु.), शिवणीजवळील शिवणी नाल्याला आलेल्या पुरामुळे शिवणी ते बसस्थानक रस्ता, वरुड (बु.) गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे, मंगळसा गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे मंगळसा ते बेलखेड रस्ता आणि मानोलीजवळून वाहणाऱ्या अडाण नदीला आलेल्या पुरामुळे अरक ते निंबी रस्ता बंद आहे. यातील ज्या गावांचा संपर्क तात्पुरता तुटला आहे त्यातील काही गावांना पर्यायी मार्गसुद्धा दुसऱ्या गावाला जाण्यासाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी नदी-नाल्यांना पूर आल्यास नदी-नाल्यांच्या काठावर पूर पाहण्यासाठी जाऊ नये. नदी-नाल्यांना पूर असताना पुरातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. दुचाकी किंवा चारचाकी वाहनेसुद्धा पुराच्या पाण्यातून काढण्याचे धाडस करू नये. पूर ओसरल्यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी खुला असल्याची खात्री करूनच रस्ता अथवा पुलावरून वाहने काढावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाशीम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येत आहे. एकबुर्जी धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे तोंडगाव ते वाशीम रोडवरील नाल्याला पूर आला. तसेच मंगरूळपीर तालुक्यातील खरबी-पिंप्री येथे अडाण् नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.