समुद्रपूर तालुक्याच्या नंदोरी येथील चोरडीया कॉटन इंडस्ट्रीजमधील कापसाला अचानक आग लागल्याची बातमी समोर आली आहे. या आगीत जवळपास दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती आहे. तसेच जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जाम ते वरोरा मार्गावर गणेशपूर(नंदोरी) येथील चोराडिया कॉटन इंडस्ट्रिसमध्ये दुपारच्या सुमारास कापसाच्या गंजीतून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. कापसाला लागलेली आग विझविण्याची धडपड सुरु झाली. अशातच तेथे कापसाने भरलेला मालवाहू कापूस खाली करण्यासाठी उभा होता.
या आगीने मालवाहू वाहनातील कापसानेही पेट घेतला. त्यामुळे जवळपास दोन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. दरम्यान, हिंगणघाट येथील अग्निशमन बंबाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. या आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
दरम्यान, लागलेल्या आगीच्या कारणबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातं आहे. घटनास्थळाची पाहणी केली असता आग ही ट्रकच्या सायलेंसरमधून निघालेल्या चिंगारीने लागल्याचे निदर्शनास येते. मात्र, जिनींग मालकाकडून ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे नेमकी आग लागली कशाने याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत