एका प्रेमीयुगुलाची दुचाकी विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलाला पोहता येत असल्याने तो बचावला आहे.
सांगली येथील तासगाव तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री ही घटना घडली.
नेमके झाले काय?
पोलिसांनी सांगितले की, या घटनेतील मुलगा व मुलगी हे वेगवेगळ्या गावचे आहेत. मुलगा अल्पवयीन आहे. मुलाचे दुसऱ्या गावात राहणाऱ्या आपल्या मावशीकडे येणे-जाणे होते.
मावशीच्या जवळच ही मुलगी राहत होती. तिच्यासोबत मुलाचे सुत जुळले. त्यानंतर त्यांच्या नियमित भेटीगाठी सुरू झाल्या.
सोमवारीदेखील मुला-मुलीची भेट ठरली. गावापासून दूर निवांत ठिकाणी बसण्यासाठी म्हणून दोघेही दुचाकीवरुन गेले. नंतर मुलीला घरी परत सोडण्यासाठी ते निघाले. मात्र, तोपर्यंत रात्र झाली होती. वाटेत अंधार झाल्याने मुलाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वाटेत एका रस्त्याशेजारी असणाऱ्या विहिरीत दोघेही दुचाकीसह कोसळले.
मुलाला पोहता येत असल्याने तो पोहून विहीरीबाहेर आला. पण, मुलीला पोहता येत नव्हते. त्यामुळे पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मुलीच्या पालकांनी तासगाव पोलिसात मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे.