भाजपच्या महिला नेत्याच्या पतीने जीवन संपवलं; ‘त्या’ चिठ्ठीतील आरोपावर माजी आमदाराचा खुलासा

अकोला : नागपुरातील अजनी रेल्वे स्थानकावर अविनाश मनतकार यांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. अविनाश हे अकोल्यातील भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा नयना मनतकार यांचे पती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मनतकार यांनी आपल्या आत्महत्येला भाजपचे बुलढाणा जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. संचेती हे मलकापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष आहेत. अविनाश आणि नयना मनतकार यांच्यावर मलकापूर अर्बनमध्ये ३.८५ कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, अविनाश यांनी ‘सुसाईड नोट’मध्ये अकोल्यातील एका पोलीस निरीक्षकाने आपल्याकडून ३८ लाख उकळल्याचाही गंभीर आरोप केला आहे. आता या सुसाईड नोटमध्ये केलेल्या आरोपांबद्दल चैनसुख संचेती यांनी खुलासा दिला असून अविनाश यांनी अटकेच्या भीतीतून आत्महत्या केली असावी, असा दावा केला आहे.
अविनाश मनतकार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातलं एक मोठं नाव. तेल्हारा येथील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष. याशिवाय अकोल्यातील भाजपाच्या जेष्ठ नेत्या आणि महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा नयनाताई मनतकार यांचे ते पती. या दाम्पत्यावर २४ सप्टेंबरला २०२२ अकोला शहरातील रामदासपेठ पोलिसांत भ्रष्टाचार आणि फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा ‘मलकापूर अर्बन बँके’त बनावट खात्यांच्या माध्यमातून केलेल्या ३ कोटी ८५ लाखांची फसवणूक प्रकरणाचा. मात्र आपल्यावरचा भ्रष्टाचाराचा आरोप बिनबुडाचा असल्याचा दावा मनतकार कुटुंबियांनी केला. झालेला भ्रष्टाचार हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार चैनसुख संचेती आणि उपाध्यक्ष लखाणी यांनी केल्याचा अविनाश यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून केला आहे. नागपूरला न्यायालयीन कामासाठी मनतकार दाम्पत्य गेलं होतं. यावेळी अचानक गायब झालेल्या अविनाश यांनी अजनी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली.
सुसाईड नोटमध्ये केलेल्या आरोपांबद्दल चैनसुख संचेतींचा खुलासा

माजी आमदार चैनसुख संचेती या संदर्भात बोलताना म्हणाले की, “मनतकारांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये केलेला आरोप बँकेचा अध्यक्ष या नात्याने माझ्यावर आणि उपाध्यक्ष लखाणी यांच्यावर केला. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत बाजू मांडावी लागत आहे. कारण आज माझ्यासह पक्षाची मोठी बदनामी होत आहे. तरी सत्य परिस्थिती सर्वांना समजली पाहिजे यासाठी, आज सांगतोय की अकोल्यातील मलकापूर अर्बन बँक शाखेतील अधिकारी राजेश यांनी अविनाश मनतकार आणि नयना मनतकार तसेच दीपक नामक व्यक्तीच्या मदतीने खोटी बनावटे कागदपत्र सादर करून दोन खोटी बँक खाती उघडली. अविनाश आणि नयना तसेच दीपक यांच्या सांगण्यावरून या बँक खात्यात वेळोवेळी मोठ्या बढ़त्या केल्या गेल्या. जवळपास ७ कोटीहून अधिक रक्कम अपरातफर करून बँकेची फसवणूक करण्यात आली. ही बाब उघड झाल्यानंतर लागलीच यासंदर्भात अकोल्याच्या रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या सर्वांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. यातील दोघांना अटक झाली असून हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. तसेच नागपूरच्या न्यायालयात या दोघांनाही अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा न्यायालयाने जमीन नामंजूर करत पोलिसांसमोर शरणागती करावी असे सांगितले. यासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत दिलेली ही मुदतवाढ संपली. त्यामुळे दोघांनीही परत न्यायालयात धाव घेतली अन् अटक न व्हावी, म्हणून आणखी मुदतवाढ मागितली. परंतु न्यायालयाने ती मागणी नामंजूर केल्याचं समजते. त्यामुळेच अविनाश मनतकार यांनी अटकेच्या भीतीतून आत्महत्या केली असावी,” अशी शक्यताही संचेती यांनी व्यक्त केली आहे. ते मलकापूर शहरात आयोजित पत्रकार परिषद बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *