वाशिम : शेती परवडत नाही अशी सगळीकडेच ओरड होत असतांना काही शेतकरी मात्र सेंद्रिय शेतीची कास धरत वेगवेगळे प्रयोग करून लाखोंचं उत्पन्न घेत आहेत. असाच प्रयोग केलाय वाशिमच्या राधेश्याम मंत्री यांनी. राधेश्याम यांनी आपल्या शेतात तीन एकर क्षेत्रावर लायलपुरी जातीच्या खरबुजची लागवड केली.
आज ८२ दिवसांनी या खरबुजची तोडणी होत आहे. पण मंत्री यांनी हे खरबूज स्थानिक बाजारात न विकता व्यापाऱ्याच्या मदतीनं थेट जम्मू काश्मीरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यातून त्यांना थेट शेतातून १७ रुपये प्रतिकिलो इतका दर मिळाला. जर स्थानिक बाजारात विक्री केली असती तर केवळ दहा ते बारा रुपये दर मिळाला असता.
मंत्री यांच्या शेतातून पहिल्या तोडणीत साधारण २० टनांचे खरबूज निघाले आहेत तर आणखी १७ ते १८ टन उत्पादन पुन्हा मिळणार आहे. ज्यातून त्यांना सहा ते साडेसहा लाखांचे उत्पादन होणार आहे. आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर टोतावार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ट्रक जम्मू काश्मीरला रवाना करण्यात आला आहे.