- विनायक विद्या मंदिर, विनायक विधी महाविद्यालय, विनायका गुरुकुल येथे भव्य आयोजन
- योगा पिरॅमिडस सादरीकरण ठरले लक्षवेधी….
भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा केला जातो. याच शृंखलेत मंगळवारी अमरावती येथे ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारे संचालित विनायक विद्या मंदिर,विनायक विधी महाविद्यालय व विनायका गुरुकुल येथे या निमित्ताने विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्षा-आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्राचार्य-डॉ. पद्माकर टाले, यश खोडके, विनायका गुरुकुल अडमिनिस्ट्रेटीव्ह हेड – रेखा सुर्वे,मुख्याध्यापिका-आरती निर्मळ आदी उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व अतिथींचे परेड पथकाचे वतीने शिस्तबद्ध पथसंचालन करीत स्वागत करण्यात आले. तद्नंतर आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय विनायकराव खोडके यांच्या प्रतिमेस वंदन,पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान सर्व उपस्थितांच्या वतीने राष्ट्रध्वजाला सामुहिक सलामी देण्यात आली. यावेळी जन गन अधिनायक जय हे या सामुहिक राष्ट्रागांनाद्वारे सर्व उपस्थितांचे वतीने राष्ट्राप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी भारत माझा देश आहे. यावेळी सामूहिक प्रतिज्ञेत सर्वांनी नोंदविलेला सहभाग लक्षवेधी ठरला होता. तद्नंतर सर्वांचे वतीने संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यादरम्यान महाविद्यालयीन व शालेय प्रतिनिधींचे वतीने अतिथींचे याथोचितपणे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी चिमुकल्यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य प्राप्ती व तद्नंतर सुरू असलेल्या भारतीयांच्या प्रगत वाटचालीचे महत्व अधोरेखित केले. यादरम्यान विद्यार्थ्यांच्या वतीने योगा पिरॅमिडस चे अप्रतिम सादरीकरण करून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्याचे चित्र दिसून आले. याप्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशवंत-गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन कार्यासह क्रीडा व अकॅडेमिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सुलभाताई खोडके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-प्रा. डॉ. शीतल काळे ,इतिका शेंगर ,अवंतिका इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन-याशिका सनाई यांनी केले.भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो ! आज आपला भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करून उद्यापासून आपण शतकाकडे मार्गस्थ होत आहोत.सर्व देशवासियांना ७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या शब्दात आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी सर्व उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.