गेल्या 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपासून पाणी घेणं देखील बंद केलं आहे. तसेच आपलं आमरण उपोषण आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले .
विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना आपल्या हस्ते फळाचा रस देऊन उपोषण मागे घेतले आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. तर याच पार्श्वभूमीवर सरकारने मराठा आरक्षणाचा तोडगा सोडवण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांच्याकडे मागितला होता. त्यामुळे जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आणि अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले.
मराठ्यांना आरक्षण देण्यास सरकार सदैव प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते.