नागपूर : नागपुरात दिव्यांग व्यक्तींच्या लसीकरणासाठी स्वतंत्र सेंटर उभारण्यात आले आहे. आजपासून या सेंटरला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील यशवंत स्टेडियममधील सीआरसी केंद्रात हे सेंटर सुरु करण्यात आलं आहे. यामुळे दिव्यांग नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दिव्यांग नागरिकांना जे सगळ्या सेंटरवर जाऊन थांबावं लागत होतं तो त्रास आता त्यांना होणार नाहीये. त्यातच त्यांच्यासाठी या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना सेंटरवर येण्यास अडचण आहे त्या नागरिकांसाठी बसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. साध्य 45 वर्षांवरील दिव्यांग नागरिकांचं या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमानुसार लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. या सेंटरमुळे दिव्यांग व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे.
नागपूर जिल्ह्यात लसीकरणाची गती संथच
नागपूर जिल्ह्यात लसीकरणाची गती संथच आहे. संपूर्ण जिल्ह्यात काल दिवसभरात फक्त 1209 जणांचं लसीकरण झालं. तर काल दिवसभरात शहरात 999 तर ग्रामीणमध्ये 210 जणांनी लस घेतली. लसलसीचा तुटवडा असल्याने लसीकरण संथ गतीने सुरु आहे. संथ लसीकरणामुळे 100 टक्के उद्दीष्ट कधी साध्य होणार हा प्रश्न आहे.
नागपुरातील कोरोना स्थिती काय?
नागपुरात काल दिवसभरात 357 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीये. तर 1041 जणांनी केली कोरोनावर मात केलीये. तर 13 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
एकूण रुग्ण संख्या – 474286
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 458613
एकूण मृत्यू संख्या – 8892
नागपूर प्रशासनाची मोहीम, 2 दिवसात अधिकाऱ्यांच्या शंभर गावांना भेट
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केलं आहे. गेल्या दोन दिवसात अधिकाऱ्यांनी शंभराहून अधिक गावे पिंजून काढली. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या मोहिमेचा नियमित आढावा घेत आहेत. ग्रामीण भागाला कोरोनाच्या सावटातून दूर काढण्यासाठी या मोहिमेतून गावागावाचा कृती आराखडा तयार केला जात आहे. तशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय.
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ग्रामीण भागातील दौऱ्याचा धडाका लावलाय. सलग दुसऱ्या आठवड्यात त्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक उपकेंद्र यांना भेटी देणं सुरु ठेवलंय. सोबतच मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये प्रचार प्रसिद्धी मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात तेरा तालुक्यांमध्ये 52 अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.