मुंबई: भाजपला सात वर्षे पूर्ण झाल्याने भाजपच्या कारभाराचा निषेध म्हणून काँग्रेसने आंदोलने केली. तर राष्ट्रवादीने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात जी जी स्वप्ने दाखवली त्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. सात वर्षात महागाई कमी झाली नाही… पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत… लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये आले नाहीत… दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले, त्यापैकी कुणालाच रोजगार मिळाला नाही… मोदींनी जी जी स्वप्ने दाखवली त्यातील एकपण पूर्ण केले नाही, अशी टीका मलिक यांनी केली आहे.
कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन टर्म आणि केंद्र सरकारने सात वर्षे पूर्ण केली आहेत. मोदी दुसऱ्या टर्ममध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. वेळेत निर्णय घेण्यात आले नाहीत. वेळेत ज्या वस्तूंची आवश्यकता होती त्यावरही योग्य निर्णय घेतला नसल्याने कोट्यवधी लोक कोरोना बाधित झाले. तर लाखो लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली, असं मलिक म्हणाले.
मोदी सरकारची नाकामी
कोट्यवधी लोक रोजगाराला मुकले. काही लोक बेरोजगार झाले. कित्येक लोकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागले. अर्थव्यवस्था अक्षरशः चौपट आहे. यापेक्षा मोदी सरकारची नाकामी असूच शकत नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
गरीब गरीबच राहिला
सात वर्षात देशात गरीब गरीबच राहिला. बेरोजगारी वाढली. महागाई जास्त झाली. भाजपच्या सात वर्षाच्या राजवटीत सामान्य लोकांच्या जीवनात कोणताच बदल झाला नाही ही सत्य परिस्थिती आहे, असा आरोपही त्यांनी केला.