हत्याकरून तरुणाचा मृतदेह जाळला; पाच आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी

अमरावती – अमरावती शहरात धृतगती महामार्गापासून वडद शेतशिवरलागत तरुणाची चाकू भोसकून हत्त्या करून मृतदेह जाळण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी समोर आला. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने पाच आरोपींना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून अटक केली आहे. आरोपींना न्यायलायसमोर आज हजर केले असता त्यांना 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेलपुरा परिसरात राहणाऱ्या रोहन उर्फ बच्चू वानखडे (वय 21) याची हत्या करण्याप्रकरणात राजापेठ परिसरातील रहिवासी आकाश दिलीप मोरे (वय 26), करण कैलास इटोरिया (वय 21), रोहित अमोल मांडळे (वय 20), बेलपुरा परिसरातील रहिवासी प्रशांत उर्फ सोनू लक्ष्मण चावरे (वय 21) आणि कल्याण नगर परिसरातील रहिवासी नितेश नारायण पिवाल (वय 26) हे पाच आरोपी आहेत.

29 मे रोजी दुपारी 4 वाजता पाचही आरोपी बच्चू वानखडेच्या घरी आले होते. त्यांनी बच्चू वानखडेला सोबत बाहेर नेले. तेव्हापासून बच्चू वानखडे घरी परतला नाही. याबाबत बच्चूच्या घरच्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. दरम्यान, धृतगती महामार्गापासून काही अंतरावर वडद शेतशिवारात भाजलेल्या अवस्थेत मृतदेह पडून असल्याचे काही गुराख्यांना आढळून आले. त्यांनी याबाबत बडनेरा पोलिसांना माहिती दिली. बडनेरा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असता हा मृतदेह बच्चू वानखडेचा असल्याचे स्पष्ट झाले.

आरोपींनी बच्चू वानखडे याच्या पोटात 43 वार केल्याचे समोर आले असून इतक्या क्रूरपणे हत्त्या केल्यावर आरोपींनी त्याचा मृतदेह जाळला. पोलिसांना वानखडेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. तर मृतदेहाचे प्राण्यांनी लचके तोडले होते तसेच डोके फुटले असल्याने मेंदूही बाहेर आला होता.

बच्चू वानखडे याची इतक्या क्रूरपणे हत्त्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पाचही आरोपींना 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या पाच दिवसात बडनेरा पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी केल्यावर हत्त्येचे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *