नाशिक येथे कृषी भवन उभारणार; उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

नाशिकः पुणे येथे सध्या 222 कोटी रुपये खर्चून कृषी भवन निर्माण केले जात आहे. तसेच कृषी भवन नाशिक येथे उभारले जाईल, अशी घोषणा गुरुवारी (30 सप्टेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

नाशिक येथील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था ‘मित्रा’च्या नूतन इमारतीच्या आणि मुख्य अभियंता कार्यालयाच्या इमारतीचे ई-उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आभासी पद्धतीने तर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, संस्था निर्माण करण्याबरोबरच त्या दर्जेदारपणे चालल्याही पाहिजेत. त्या दीर्घकाळ उपयोगात आल्या पाहिजेत. यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून, त्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती म्हणजे ‘मित्रा’ आहे. आज या संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन करतानाच राज्याची तहान भागविणारे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून येथिल औद्योगिकीकरणाचा व नागरीकरणाचा वेग यांच्याशी शिक्षण, रोजगार आणि लोकसंख्या सांघड घालून शहरांच्या विकासाचे नियोजन सुरू असल्याचे ते म्हणाले. या नियोजनात स्वच्छ पाण्याबरोबर त्याची गुणवत्ता राखण्याचीही काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे, ही गुणवत्ता ‘मित्रा’ च्या माध्यमातून जपण्याचे काम निरंतर सुरू आहे. भविष्यातही ते सुरू राहील. राज्यात केंद्रासोबत १४ हजार कोटींच्या पाणी योजनांची उभारणी सुरू आहे. या योजनांच्या निर्मितीसोबतच जलसाक्षरता व जनजागृतीची गरज आहे. पुणे येथे सध्या 222 कोटी रुपये खर्चून कृषी भवन निर्माण केले जात आहे. तसेच कृषी भवन नाशिक येथे उभारले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली. नाशिकमध्ये कृषी भवन उभारण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मित्रा’ होईल यशस्वी : भुजबळ

पर्यावरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये ‘मित्रा’ ही संस्था निर्माण करण्यात आलेली असून देशात आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर ही संस्था यशस्वी होईल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अतिशय चांगले वातावरण असलेल्या नाशिक येथे मित्रा संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. ही संस्था अतिशय उपयोगी ठरणार आहे. मित्रा येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्ती नाशिक जिल्ह्यात असंख्य ठिकाणाचा अभ्यास तसेच पर्यटन करता येणे शक्य होणार आहे.

‘मित्रा’ माध्यमातून देशाच्या व जगाच्या पातळीवर जे नवनविन तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्याचे त्याचे प्रशिक्षण, व्यवस्थापनासोबतच देखभाल, दुरूस्तीचेही प्रशिक्षण देणारा हा भव्य प्रकल्प शेतकऱ्यांसाठी योगदान ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *