चांदवड तालुक्यातील कानमंडळी येथील महाराष्ट्र जलजीवन मिशन कामाचे उद्घाटन काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री भारती पवार व चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉक्टर राहुल अहिर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. परंतु संबंधित ठेकेदार यांना महाराष्ट्र जलजीवन मिशन यांचे काम करण्यास दिले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर या कामाच्या चौकशीसाठी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना कळविले असून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या कामाच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी कमिटी तयार करून या कामाची चौकशी करण्यासाठी पाठवण्यात आले. मात्र या कमिटीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामपंचायत कानमंडळ येथील सदस्य व स्थानिक नागरिकांचा विचारत न घेता गावात फक्त येऊन पाच मिनिटे थांबले व लगेच रवाना झाले अशी देखील तक्रार करण्यात आली आहे.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी चांदवड पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी यांना देखील चौकशी पत्र दिलेले आहे. तसेच या कामाचा जो ठेकेदार असेल तो ठेकेदार शासकीय नियमानुसार दिलेले काम प्रामाणिक पणे करत नाही अशीही तक्रार होत आहे. तसेच या महाराष्ट्र जलजीवन मिशनद्वारे कानमंडळ येथील नागरिकांना पाणी पिण्यास मिळेल की नाही या उद्देशाने आज प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून नागरिकांनी आपली व्यथा मांडली. या निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार यांच्यावर योग्य कारवाई करावी. आणि पाण्याचा प्रश्र सोडवावा अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे.