नाशिक पोलिसांनी प्रथमच एका महिलेवर तडीपारीची कारवाई केली आहे. भारती आहिरे (वय ४५) असे या महिलेचे नाव असून या महिलेच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात दहशत माजवणे, खंडणी मागणे, विनयभंग सारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पैसे उकळणे तसेच परिसरात दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
नाशिकमध्ये प्रथमच एका महिलेवर जिल्हाबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आतापर्यंत ७० हून अधिक जणांवर तडीपाडची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसणार आहे त्याचबरोबर नाशिक शहरात शांतता राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या व समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या गुन्हेगारांची माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. अशा गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्याची प्रक्रीया सुरू आहे. यांच्यावर पोलिसांची नजर राहणार असून नाशिक शहर किंवा जिल्ह्यात आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.