नवी दिल्ली,
आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील लागू करण्यात आलेले निर्बंध 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे. या निर्बंधकांचा कालावधी 1 जुलैला संपणार होता. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक ही मर्यादित स्वरूपात चालवण्यात येत आहे. वंदे भारत योजनेनुसार विमानांची उड्डाणे सुरू आहेत. पण, देशांतर्गत विमानाच्या वाहतुकीवरील बहुतांश निर्बंध हटवण्यात आले आहेत.
डीजीसीएने आज बुधवारी एक परिपत्रक जारी केले आहे. यानुसार आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्बंध 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहेत, पण माल वाहतूक करणारी आंतरराष्ट्रीय विमाने आणि डीजीसीएने मंजुरी दिलेल्या उड्डाणांना हा आदेश लागू असणार नाही, असे पत्रकात म्हटले आहे. काही ठराविक मार्गांवर विमानांची उड्डाणे सुरू आहेत. पण, या हवाई प्रवासात कोरोना संबंधी नियमांचे पालन संबंधित कंपन्यांना करावे लागणार आहे. यासंबंधी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, एअरपोर्ट ऑपरेटर्स, ब्युरो ऑफ इमिग्रेशन यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाणे ही संबंधित देशाच्या करोनासंबंधी नियम आणि निर्बंधांवर आधारित आहेत. अनेक देशांनी भारतातून येणार्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.