जालना : दगडांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून, दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. जालन्यातील आरतखेडा गावच्या परीसरात ही घटना घडली आहे. १२ वर्षीय चेतन धोत्रे आणि १६ वर्षीय गणेश निंबोळे अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. ही दोन्ही मुले खदानीतून ट्रॅक्टरच्या माध्यमातून दगडांची वाहतूक करत होते.
रस्त्यावरुन ट्रॅक्टर चालवताना, गणेश निंबोळे यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन हे दोन मुले ट्रॉलीखाली दबली गेली. या दोन्ही मुलांना परीसरातील नागरीकांनी जाफ्राबाद या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले आहे. या घटनेमुळे परीसरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे.