तालुका प्रतिनिधी/ प्रविण शर्मा
- मागील एक वर्षापासुन शेताचा वहिवाटीचा रस्ता बंद
- शेती पडीत; शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी
चांदूर रेल्वे | चांदूर रेल्वे उपविभागातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील वडगाव राजदी येथील रहिवाशी असलेले दोन शेतकऱ्यांचा शेतात जाणारा वहिवाटीचा रस्ता मागील एक वर्षापासुन बंद केलेला आहे. त्यामुळे त्यांची शेती पडीत पडली असुन त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे उपासमारीने मरण्यापेक्षा आत्मदहन करून मरण्याची परवानगी द्या अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मोहन परसराम राऊत हे आदिवाशी तर शोभा विश्वनाथ सोमकुंवर या मागासवर्गीय असुन त्यांचे वडिलोपार्जित मालकीची शेती असुन त्यावर त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतोे. वडगाव बाजदी रहिवाशी कांता राजेंद्र हांडे यांनी १० वर्षापुर्वी शेत गट क्र.१९७/४ खरेदी केले. त्यांच्या शेताच्या धुऱ्यावरून वहिवाटीचा रस्ता आहे. त्यांना शेतातुन जाण्यास मज्जाव करीत त्यांचा जाणे-येणे बंद करण्यासाठी जाणीवपूर्वक १० फुट रूंदीचा धुरा काढुनी जुलै २०२१ मध्ये संत्रा झाडांची लागवड केली. दोन्ही शेतकरी मागासवर्गीय असल्याने त्यांची हडप करण्याचा उद्देशाने तार कंम्पाऊड टाकुनी लोखंडी गेट लावले. त्यामुळे त्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा कोणताही रस्ता नसल्यामुळे वाहितीतील शेती १ वर्षापासून पडीत आहे. कांता हांडे विरूध्द त्यांनी चांदूर रेल्वे पो.स्टे.ला तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता याउलट त्यांनाच कांता हांडे यांच्या विनयभंग व बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देतात.रस्ता देणे महसुल विभागाचे धामणगाव चे तहसिलदार व एसडीओ यांचे काम असुन त्यांनी या प्रकरणाची कोणतीही शहनिशा न करता राजकिय व उच्चवर्णीयाच्या दबावाखाली येऊन त्यांचा पारंपारीक,अत्यावश्यक वहिवाटीचा रस्ता न देण्याचा निर्णय घेऊन त्यांच्यावर अन्याय केलेला आहे.त्यामुळे त्यांना शेतीची वाहीपेरी,नांगरणी करता येत नाही.मोहन राऊत यांच्यावर मुलीच्या लग्नाचे कर्ज असुन शेत पडीत असल्याने व कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अशीच स्थिती शोभा विश्वनाथ सोमकुंवर यांची आहे. या अन्यायाविरूध्द त्यांनी वारंवार निवेदन दिलेले आहे. मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही.त्यामुळे असे उपासमारीने व लोकांचे कर्ज घेऊन जगण्यापेक्षा येत्या १५ मार्च ला चांदूर रेल्वे एसडीओ कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगीची मागणी केली आणि त्यासाठी अन्याय करणारे कांता राजेंद्र हांडे,तहसिलदार व एसडीओ यांना जबाबदार धरण्यात यावे असे निवेदनात नमुद करीत त्यांची प्रत विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री, महसुल मंत्री, समाजकल्याण मंत्री, म. रा. अनुसूचित जाती जमाती आयोग यांना पाठविले आले आहे.