Amravati । गाव तलावाच्या आंदोलनात तीन महिलांनी घेतले विष, महिला सरपंचाचा समावेश : प्रकृती गंभीर

दर्यापूर |

तालुक्यातील लोतवाडा येथे गाव तलाव हटविण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यां तीन महिलांनी विष घेतले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या तीन महिलांमध्ये महिला सरपंचाचा समावेश आहे. दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा या गावामध्ये असणार्‍या गाव तलावाचे पाणी दरवर्षी पावसाळ्यामध्ये गावातील नागरिकांच्या घरात शिरते. यामुळे अतोनात नुकसान होत असून भविष्यात जीवित हानी टाळता येणार नाही, अशी स्थिती आहे.

या गाव तलावाला हटवून इतरत्र तलाव निर्माण करावा किंवा या तलावाच्या आऊटलेटची दिशा बदलावी या मागणीकरिता झालेल्या आंदोलनात शुक्रवारी एकूण सहा जणांनी भाग घेतला होता. या पैकी महिला सरपंचसह तीन महिलांनी विषारी द्रव्य प्राशन करीत आत्मदहनाचा प्रयत्न केला. उर्वरित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरपंच पंचफुला भीमराव कुराडे, कोकिळा राजू रक्षे व सुमित्रा सुभाष रायबोले, अशी या महिलांची नावे आहेत. या महिलांना पोलिसांनी तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती अतिगंभीर असल्याचे सांगत डॉक्टरांनी तातडीने त्यांना अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात रवाना केले.

दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा या गावाकरिता पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून दहा वर्षापूर्वी गाव तलाव तयार करण्यात आला. या तलावाच्या आऊटलेटचे पाणी दरवर्षी गावांमध्ये शिरत असल्याने अनेक नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. यासह जीविताची हानी नाकारता येत नाही. याकरिता सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे यांच्या नेतृत्वात गावकर्‍यांनी प्रशासनाकडे अनेकदा निवदने दिली. सरपंच पंचफुला कुराडे यांनीसुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाला संभाव्य संकटाबाबत अवगत केले आहे; मात्र प्रशासन ढिम्मपणे काम करीत असून नागरिकांच्या मागणीसाठी कोणताही प्रस्ताव तयार केलेला नाही. मागील वर्षी याच ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुद्धा भीमराव कुराडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.

त्यावेळी पाटबंधारे विभागाने लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतरही हालचाल न झाल्याने भीमराव कुराडे यांच्या नेतृत्वात सरपंच पंचफुला भीमराव कुराडे, कोकीळाबाई राजू रक्षे, सुमित्रा सुभाष रायबोले , राजू तुळशीराम रक्षे, सुभाष रायबोले यांनी पाटबंधारे विभागाला 24 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार शुक्रवारी गाव तलावाच्या जवळ आंदोलन करण्यात आले. यासह दर्यापूरच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर सुद्धा आंदोलन करण्यात आले. दर्यापुरातील आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गाव तलावाजवळ आंदोलनकर्त्या महिलांना ताब्यात घेण्यास पोलिस पोहचले असता त्यांनी त्यांच्या जवळचे विषारी द्रव्य पोलिसांसमोर प्राशन केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *