युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी मुंबईत दाखल झाल्यानंतर पियुष गोयल यांनी केले स्वागत

मुंबई – एअर इंडियाचे पहिले विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई विमानतळावर पोहोचले आहे. युक्रेनमधून रोमानियाला आल्यानंतर तेथून एकूण २१९ विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद –
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे पहिले विमान आज संध्याकाळी आठच्या सुमारास मुंबईत दाखल झाले आहे. 219 विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान रोमानियावरुन निघाले आणि शनिवारी संध्याकाळी हे विमान मुंबईत दाखल झाले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी मायभूमीत परतल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. अजूनही एक विमान दिल्लीत दाखल होणार असल्याची माहिती मंत्री गोयल यांनी दिली.

पियुष गोयल यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत –
युद्धग्रस्त युक्रेनमधून विमानाद्वारे येत असलेल्या भारतीयांसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष कॉरिडॉर स्थापन करण्यात आला आहे. युक्रेनमधून येणाऱ्या भारतीयांकडे कोविड लसीकरण प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. दरम्यान, या विमानाने रोमानियातून उड्डाण केले होते.

एअर इंडियाच्या विमानाने रोमानियामधून केले होते उड्डाण –
एअर इंडियाचे Boeing 787 चे AI-1943 क्रमांकच्या विमानाने आज पहाटे मुंबईहून ३ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण केले होते. हे विमान रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये सुरक्षितपणे उतरले. यानंतर भारतीय नागरिकांना घेऊन या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले होते. या विमानात २१९ भारतीय होते.

मुंबई विमानतळावर विद्यार्थ्यांचे स्वागत
यूक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले देशभरातील हजारो विद्यार्थी आणि नागरिक युद्धामुळे अडकले आहेत. त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्याची मागणी त्यांचे कुटुंबीय करत होते. रशियाच्या सातत्याने सुरु असलेल्या हल्ल्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठी संकटाला सामोरं जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर भारत सरकारने यूक्रेन आणि रशियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याची मोहिम हाती घेतली. त्यानुसार रोमानिया आणि हंगेरी मार्गे या विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडिया विमानाने शनिवारी दुपारी रोमानियातून उड्डान घेतलं आणि शनिवारी संध्याकाळी ते मुंबईत दाखल झाले. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार पुनम महाजन, महापौर किशोरी पेडणेकर, भाजप आमदार पगार शाह, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *