मुंबई : एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांच्याकडील खाती काढून दुसऱ्यांकडे सोपावण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) धोक्यात आलं आहे. याचदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे. ‘कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी करून गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. काल एकनाथ शिंदे आणि महाविकास आघाडी सरकारने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना नोटिसा बजावल्या आहेत. तर पुढील सुनावणी ११ तारखेला होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विधानसभा उपाध्यक्षांना बंडखोर आमदारांवर ११ जुलैपर्यंत कारवाई करता येणार नाही. याचदरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना भावनिक आवाहन केलं आहे.
बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत, आपण आजही मनाने शिवसेनेत आहात . आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे.
‘आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू’, असंही ठाकरे म्हणाले.